गुरुपौर्णिमा विषयक प्रवचन
नमस्कार ! प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले व त्यांचे गुरु प.पू. श्रीमत् सदगुरु भक्तराज महाराज यांना वंदन करून आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमाही म्हटले जाते. महर्षी व्यास यांनी ब्रह्मसूत्रे, महाभारत, श्रीमद्भागवतासह अठरा महापुराणे इत्यादी महान रचना केल्या. व्यासांनी लिहिले आहे, त्यापेक्षा नवीन कोणीच सांगू शकणार नाही. म्हणून `व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।' म्हणजे व्यासांनी वाणीवाटे सर्व ग्रंथ सांगितल्यामुळे एक प्रकारे त्यापुढे लिहिले गेलेले `सर्व ग्रंथ व्यासांचे उच्छिष्ट आहे', असे म्हटले गेले आहे. भूमितीत व्यास म्हणजे वर्तुळातील सर्वांत मोठी आतली रेषा. व्यासांचे वा*्मयही तसेच सर्वांत मोठे आहे. सभेत बोलणारा वक्ता ज्यावर उभा रहातो, त्याला व्यासपीठ म्हणतात. व्यासांप्रमाणे त्यालाही त्याच्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान असावे, अशी अपेक्षा असते. व्यासांच्या महान ग्रंथरचनेमुळे त्यांना आदिगुरु म्हणतात. अशा महर्षि व्यासांचे पुण्यस्मरण म्हणून बहुतेक ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रथम व्यासपूजा व नंतर गुरुपूजा करतात. जगभरातील सर्वच साधक गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यानिमित्ताने गुरुपौर्णिमेची माहिती करून घेऊया.
सर्वप्रथम आपण गुरुंविषयी माहिती करून घेऊया.
` गुरु ' या शब्दातील `गु'कार म्हणजे अज्ञानरूपी अंध:कार व `रु'कार म्हणजे अंधाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज. म्हणून गुरु म्हणजे `अज्ञानरूपी अंध:कार घालवणारा' अशी गुरु या शब्दाची व्युत्पत्ती आहे. शिष्याचे अज्ञान घालवून त्याला ईश्वरप्राप्ती व्हावी, यासाठी साधना सांगून ती करवून घेतात व अनुभूती देतात त्यांना गुरु असे म्हणतात.
परमोच्च अशा ब्रह्माचे आनंद स्वरूप असे सर्वोच्च सुख देणारे, ज्ञानाचे मूर्तिमंत साकार रूप म्हणजे गुरु होय. गुरु हे आकाशासारखे व्यापक आहेत. तसेच ते शाश्वत, शुद्ध व स्थिर अशी सर्वोच्च बद्धीमत्ता असलेले सर्वसाक्षी आहेत. गुरूंना ब्रह्मा, विष्णु व महेश यांची योग्यता बहाल केली आहे; कारण ब्रह्मदेव ज्याप्रमाणे निर्मिती करतो, त्याप्रमाणे गुरु हे एका अज्ञानी माणसाचे रूपांतर एका ज्ञानी व सुसंस्कृत शिष्यात करतात. विष्णु ज्याप्रमाणे रक्षण करतो, त्याप्रमाणे गुरु हे आपल्या शिष्याचे वाईट प्रवृत्तींपासून रक्षण करतात. महेश ज्याप्रमाणे संहार करतो, त्याप्रमाणे गुरु हे शिष्याच्या ठिकाणी उद्भवणार्या वाईट विकारांचा व विचारांचा नाश करतात. म्हणून शेवटी गुरूंचा उल्लेख परब्रह्माची उपमा देऊन केला आहे.
आता गुरुप्राप्ती व्हावी, यासाठी काय करायचे ते आपण पाहूया. समजा, आपल्याला वर्गात वर्गप्रमुख (मॉनिटर) व्हायचे असेल, तर आपण काय करू? तर शिक्षकांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच नियमितपणे अभ्यास करू, वर्गात शिस्तीने वागू, शिक्षकांना अपेक्षित असेल, तसेच करू. त्याचप्रमाणे गुरुप्राप्ती व्हावी यासाठी गुरूंचे किंवा एखाद्या अध्यात्मिकदृष्टया उन्नत व्यक्तींचे मन जिंकणे आवश्यक असते. गुरुकृपा सातत्याने व्हावी, यासाठी गुरूंचे मन सातत्याने जिंकावे लागते. उन्नत व संत यांना आवडणारी गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे `साधना'. गुरुप्राप्तीसाठी व सततच्या गुरुकृपेसाठी सातत्याने तीव्र साधना करणे आवश्यक आहे. हीच गुरुकृपायोगानुसार साधना होय.
विद्यार्थांसाठी गुरुकृपायोगानुसार साधना कोणती, ते पाहू. या साधनेचा पाया म्हणजे नामजप. ईश्वराचे सतत स्मरण करणे याला `नामजप', असे म्हणतात. अनेक देवी-देवतांपैकी आपल्या कुलदेवतेचा नामजप आपल्यासाठी जास्त उपयुक्त असतो. ज्यांना फक्त कुलदेव असेल त्यांनी कुलदेवाचा व फक्त कुलदेवी असेल त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा. कुलदेव व कुलदेवी दोन्ही असल्यास त्यांनी कुलदेवीचा जप करावा, उदा. कुलदेवी भवानीमाता असल्यास ` श्री भवानीदेव्यै नम:। ' असा नामजप करावा. कुलदेव खंडोबा असल्यास ` श्री खंडोबाय नम:। ' असा जप करावा. कुलदेवता माहित नसल्यास ` श्री कुलदेवतायै नम:। ' असा जप करावा. हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मियांनी आपआपल्या धर्मानुसार नामजप करावा. नामजपाच्या जोडीला आपल्यामध्ये सद्गुण येण्यासाठी आपण काय केले पाहिजे, तर नम्रता, देवाला व वडिलधार्यांना नमस्कार, सर्वांप्रती प्रेमभाव, चांगली संगत यासाठी सतत प्रयत्न इत्यादी. अशा प्रकारे साधना केल्याने आपल्याकडे गुरुकृपेचा अखंड ओघ येत रहातो.
गुरुप्राप्तीसाठी शिष्यात कोणते गुण आवश्यक आहेत, ते आत्ता आपण समजून घेऊया. कारण हे गुण अंगी बाणविल्यास जलद गुरुप्राप्ती होईल किंवा झाली असल्यास ती टिकवता येईल.
१ तीव्र मुमुक्षत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ :- या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते व गुरुकृपा सातत्याने रहाते. गुरूंनी मला आपले म्हणावे, त्यांची कृपा व्हावी यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून ` मी काय केले की, गुरु प्रसन्न होतील, ' या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
२ आज्ञाधारकपणा :- हा शिष्याच्या सर्व गुणांचा राजा आहे. मनात कोणताही विकल्प न आणता गुरु म्हणतील तसे सर्व केले की, आपले मन व बुद्धी वापरली जात नाही. बालमित्रांनो, पूर्वीच्या काळी मुले वर्षानुवर्षे गुरूंच्या घरी राहून शिक्षण घेत असत. गुरु त्यांना शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक असे सर्वांगीण शिक्षण देऊन त्यांना एक परिपूर्ण नागरिक बनवत असत. मुलांची क्षमता किती वाढली, हे पहाण्याकरिता गुरु अधूनमधून प्रत्येकाची परीक्षा घेत असत. बर्याचदा मुलांना कळायचेही नाही की, गुरूंनी आपली परीक्षा घेतली. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर गुरूंनी आशीर्वाद दिल्यावरच त्यांना त्याबाबत कळायचे. धौम्यऋषींनी घेतलेल्या परीक्षेत आरुणी कसा उतरतो ते आज आपण पाहूया.
धौम्यऋषींच्या आश्रमात आरुणी नावाचा एक अतिशय गुणी विद्यार्थी होता. गुरुजींनी आरुणीला बोलावून सांगितले, ``आपल्या शेतातला बंधारा पावसामुळे वाहून गेला आहे. तो नीट करून शेताला पाणी दे.'' आरुणीने ``हो'' म्हटले आणि तो शेतात गेला.
शेत खूप मोठे होते. मनोमन गुरूंना वंदन करून आरुणी चालू लागला. चारही बाजूंनी लक्ष ठेवत तो चालत राहिला. एके ठिकाणी दगडांचा बांध पाण्याच्या प्रवाहाने मोडून गेला होता. त्यामुळे पाणी शेताकडे न वळता सरळ वाहून जात होते. आरुणीने सर्व दगड गोळा करून बांध घालण्याचा प्रयत्न केला; पण पाण्याच्या प्रवाहापुढे तो काही टिकला नाही. आरुणीने पुन्हा बांध घातला, तर पुन्हा तो मोडला. आरुणी वारंवार प्रयत्न करून थकला. अखेर तो गुरूंना शरण गेला. `आता मीच या बांधाच्या जागी झोपतो; पण हे पाणी थांबवा, तरच हे शेत वाचेल', असे म्हणून गुरूंचा धावा करत अतिशय वेगाने वहाणार्या पाण्याला अडवत आरुणी दगडाच्या दोन दरडींदरम्यान झोपून राहिला.
सकाळी गेलेला आरुणी रात्र झाली, तरी आला नाही; म्हणून सर्र्वांना काळजी वाटायला लागली. बरीच रात्र झाल्यामुळे सर्वजण आरुणीला शोधायला निघाले. ``आरुणी, अरे बाळ कुठे आहेस तू ?'' गुरूंचा आवाज ऐकून आरुणीने `ओ' दिली. हातातली दिवली उंचावून जवळ जाऊन त्यांनी पाहिले, तर आरुणी पाणी अडवण्यासाठी स्वत:च शेतात बांध होऊन आडवा पडला होता. गुरूंनी सांगितलेली सेवा केलीच पाहिजे, म्हणून तो तसाच पाण्यात आडवा पडून राहिला होता. गुरुजींनी जवळ जाऊन त्याला उठवले. त्याच्या अंगावरून हात फिरवला. पाठीवर आशीर्वादपर हात ठेवत त्यांनी सांगितले, ``मी घेतलेल्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास''.
३) गुरुंप्रती किंवा ईश्वराप्रती श्रद्धा हवी :- जाणत्यांनी गुरूंना ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे; कारण ईश्वराची जाणीव गुरूच आपल्याला करून देत असतात.
३) गुरुंप्रती किंवा ईश्वराप्रती भाव हवा :- सुरुवातीला शब्दजन्य माहितीमुळे साधनेवर विश्वास बसतो. साधना करता करता अनुभूती येते. या अनुभूतींमुळे ईश्वराप्रती श्रद्धा निर्माण होते. या श्रद्धेचे भावात रूपांतर व्हावे लागते. ` भाव तेथे देव, ' असे आपण म्हणतो ना ! भाव निर्मितीसाठी एक सोपा उपाय म्हणजे कोणतीही कृती करण्यापूर्वी ईश्वराजवळ प्रार्थना करणे व त्यानुसार आपले वर्तन ठेवणे. आपण दररोज शाळेत आल्यावर प्रार्थना करतोच, त्याचप्रमाणे दररोज ईश्वराला प्रार्थना करावी, ` हे ईश्वरा, आज माझ्याकडून चांगला अभ्यास होऊ दे व माझ्याकडून चांगली कृती होऊ दे.'
भाव कसा असावा, याचे एक संुदर उदाहरण आपण पाहूया :- समर्थ रामदासस्वामींचा एक शिष्य होता. त्याचे नाव होते ` अज्ञान.' एकदा रामदासस्वामी त्यांच्या काही शिष्यांना बोरबर घेऊन तीर्थयात्रेला निघाले. जातांना त्यांनी आश्रमाची जबाबदारी अज्ञानवर सोपवली. त्याला अशी आज्ञा केली की, रामाला नैवेद्य दाखविल्याशिवाय जेवायचे नाहीस. गुरूंची आज्ञा म्हणून अज्ञानने रामाला नैवेद्य दाखवला; पण राम काही जेवेना. अज्ञानने रामाला सांगितले की, गुरूंची आज्ञा आहे, तू जेवल्याशिवाय जेवू नकोस. त्यामुळे तू जेवेपर्यंत मी काही जेवणार नाही. अज्ञानचा गुरुंप्रती भाव पाहून शेवटी रामाला प्रगट व्हावे लागले.
`समर्थ रामदास' यांनी शिवाजी महाराजांना राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी वेळोवेळी स्फूर्ती व शक्ती दिली. समर्थ रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांमध्ये जागृत केलेल्या या क्षात्रतेजातूनच ते हिंदवी राज्याची स्थापना करू शकले; परंतु हिंदवी राज्याची स्थापना हे त्यांनी कधीही स्वत:चे कर्तृत्त्व मानले नाही. तर, `हे राज्य व्हावे ही `श्रीं'ची इच्छा आहे', असे ते म्हणत असत. समर्थांनी एकदा त्यांची परीक्षा पहाण्यासाठी त्यांच्याकडे सर्व राज्य मला दे, असे म्हणताच क्षणाचाही विचार न करता राज्य गुरुंचरणी अर्पण केले.
आपणही आज गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी आपल्या अंगी प्रामाणिकपणा, नम्रता, विनयशीलता, शिस्त, अभ्यासूवृत्ती इत्यादी गुण बाणवून आपले जीवन राष्ट्राचा विकास व उन्नती यांसाठी उपयोगी पडण्यासाठी प्रयत्न करू.
सर्व गुरू जरी बाह्यत: स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते एकच असतात. जसे पाण्याच्या टाकीला लहान मोठे बरेच नळ असले, तरी प्रत्येक नळातून टाकीतीलच पाणी येते किंवा विजेचे दिवे कोणत्याही आकाराचे असले, तरी वाहाणार्या विजेमुळे निर्माण होणारा प्रकाशच त्यांतून बाहेर पडतो; अगदी त्याचप्रमाणे गुरु बाह्यत: जरी निरनिराळे दिसले, तरी त्यांच्यातील गुरुतत्व म्हणजेच ईश्वरीतत्व (ब्रह्म) एकच असते.
मुलांनो, गुरुपौर्णिमा' म्हणजे गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी गुरुतत्त्व १००० पटीने कार्यरत असते. यानिमित्त समाजामध्ये अध्यात्माचा परिणामकारक प्रसार केल्यास खर्या अर्थाने गुरुसेवा होईल व १००० पटीने कार्यरत असणार्या गुरुतत्त्वाचा आपल्यावर वर्षाव होऊन भावजागृती होण्यास मदत होईल. 'देव भावाचा भुकेला' या उक्तीनुसार यानिमित्त ईश्वराचे सगुण रूप असलेल्या गुरूंच्या चरणी अर्पण केलेला भक्ती व भाव हीच खरी `गुरुदक्षिणा' आहे.
मुलांनो, आज आपण साधना म्हणजे काय ? व ती कशी करावी याबद्दल, तसेच गुरुंविषयी माहिती, गुरुप्राप्तीसाठी शिष्यात आवश्यक असणारे गुण कोणते याविषयी माहिती करून घेतली. परंतु अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आजच्या शुभदिनापासून आपण आज ऐकलेला साधनेचा भाग आचरणात आणावा व आजचा विद्यार्थी फक्त परिक्षार्थी न रहाता खर्या अर्थाने विद्यार्थी व्हावा, हिच श्री गुरूचरणी प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले यांना वंदन करुन आजचा विषय येथेच संपवितो.
।। श्री गुरुचरणार्पणमस्तु ।।

।। श्री गुरुचरणार्पणमस्तु ।।
|
|
|